बीड प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील पिंपरी (घाट) गावात नगर भोजनाच्या कार्यक्रमानंतर सुमारे ५० जणांना विषबाधा झाली असून त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी रात्री गावात नगर भोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पहाटेपासून अनेकांना उलट्या, मळमळ, पोटदुखी अशा तक्रारी जाणवू लागल्या. यानंतर ग्रामस्थांना घेऊन सरपंच काशिनाथ कातकडे यांनी त्वरित स्वाराती रुग्णालयाकडे धाव घेतली. अपघात विभागातील सीएमओ मारुती आंबाड, सर्व परिचारिका, कर्मचारी यांच्यासह राहुल (बाबा) गित्ते यांनी तातडीने रुग्णांना दाखल करून घेत उपचार सुरू केले.
सध्या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, आमदार धनंजय मुंडे यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून बाधितांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली आणि योग्य त्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.