मुंबई दि.25(प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेतील कामगार, कर्मचारी हे गेल्या अनेक वर्षापासून मुंबई बाहेर उपनगरात राहावयास गेलेले आहेत.त्यांना अकस्मित आजाराची बाधा झाल्यास घराजवळच्या रुग्णालयात उपचार घ्यावे लागत होते. मात्र त्यानंतर त्याने आपल्या खात्याकडे वैद्यकीय आर्थिक मदतीस औषध उपचाराचा खर्च मागितल्यास महानगरपालिका देत नव्हती.त्यामुळे अनेक आर्थिक संकटाना कामगार,कर्मचा-यांना तोंड द्यावे लागत होते.मात्र म्युनिसिपल मजदूर संघाच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून गट विमा योजना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत पालिका कर्मचारी, कामगार यांना वैद्यकीय मदत देण्यात येणार आहे.
यासंदर्भात नुकतेच मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे व सहआयुक्त सामान्य प्रशासनचे मिलिंद सावंत यांनी सर्व युनियनच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन ही गट विमा योजना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती दिली.
या बैठकीला विविध युनियनसह म्युनिसिपल मजूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव, सुधाकर गायकवाड ,रुपेश पुरळकर, नितीन कांबळे ,सागर कांबळे ,सुशांत रुके पश्चिम उपनगराचे अध्यक्ष गौतम सोनकांबळे पी विभाग अध्यक्ष रमेश पायके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुन्हा युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी बरोबर तीन वर्षाचा करार करून महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांना सहित दोन मुले वय वर्ष 25 पर्यंत व आई वडील किंवा सासू-सासरे यांना वर्षाला 5 पाच लाखाचा विमा देण्याचे निश्चित केले आहे.
ही गट विमा योजना एक महिन्याच्या अवधीनंतर सुरू करण्यात येणार आहे. त्या अगोदर प्रत्येक कामगार कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवा अभिलेखात नवविवाहित असल्यास पती-पत्नीची लहान मुलांची नावे आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्या नावांची नोंद करून आपापल्या आस्थापनेतून करून घ्यावी असे आदेश दिलेले आहे.
कर्मचाऱ्यांची मागणी होती की आजार हा काही सांगून येत नाही.हृदयरोगाचा झटका, अर्धांग वायूचा झटका, अतिरक्त दाबाचा त्रास अशा अनेक तरेचे आजार केव्हाही कुठेही झाल्यास तो रुग्ण जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घेतो . मनपाचा कामगार कर्मचारी आपला जीव वाचवण्यासाठी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी जात होते . कर्मचाऱ्यांना आपत्कालीन स्थिती कोणत्याही ठिकाणी आजाराची स्थिती उद्भवल्यास जवळच्या रुग्णालयात उपचार घेण्याचे व त्याचे बिल भरण्यासाठी सन 2015- 16 मध्ये विमा योजना कामगार व मुलांसाठी सुरू केली होती.हि गट विमा योजना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या मार्फत देण्यात येत होती. या कंपनीने तीन वर्षानंतर प्रीमियमची रक्कम वाढवल्या कारणाने ती योजना बंद पडली. त्यामुळे कामगारांची आर्थिक अडचण होत होती. त्यांच्यावर रुग्णालयाचा आर्थिक भार पडत होता म्हणून कर्मचाऱ्यांची मागणी होती की पुन्हा गट विमा योजना सुरु करावी.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातच कर्मचाऱ्यांनी मोफत उपचार करून घेणे आवश्यक आहे मनपा नागरिकांना मोफत रुग्ण सेवा देते तशीच ती मनपा कामगार कर्मचाऱ्यांना देते .या कारणास्तव मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत देत नव्हती त्यामुळे कामगारांची आर्थिक अडचण होत होती त्यांच्यावर आर्थिक भार पडत होता.म्हणून म्युनिसिपल मजदूर संघाच्या पाठपुराव्याला यश आले असून वैद्यकीय खर्च करण्यासाठी मनपाच्या सहकार्याने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी गट विमा योजना लवकरच सुरु करणार आहे. या योजनेचा लाभ महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांना सहित दोन मुले वय वर्ष 25 पर्यंत व आई वडील किंवा सासू-सासरे यांना वर्षाला 5 पाच लाखाचा विमा देण्याचे निश्चित केले आहे.असे म्युनिसिपल मजदूर संघाचे सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी सांगितले.