वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी लोकसभा मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मोदी हे तिस-यांदा निवडणूक लढवत आहेत. आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी मोदींनी गंगेचे पूजन केले आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेतला.
लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी पार पडले आहे. आता पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याआधी गंगा पूजन करत वाराणसीबरोबरचे गेल्या १० वर्षांचे ऋणानुबंध आठवत शेअर केले. पंतप्रधान मोदी यावेळी काहीसे भावूक झाले होते. मोदींनी यावेळी भावना व्यक्त करताना आई गंगा मातेने मला दत्तक घेतले असल्याची प्रतिक्रिया दिली. काशीशी असलेले ऋणानुबंध सांगतानाही मोदी भावूक झाले. तसेच लोकांचे माझ्यावरील प्रेम पाहून माझ्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस आणखी वाढत असल्याचंही त्यांनी म्हटलं.