*मुंबई प्रतिनिधी
अवकाळीचे ढग गेले पण उष्णता वाढली आहे. राज्यावर पुन्हा एक नवं संकट उभं राहिलं आहे. पुढचे तीन दिवस उष्णता प्रचंड वाढणार असून अंगाही लाहीलाही होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असा इशारा दिला आहे.
राज्यभर उन्हाचा तडाखा अधिकच तीव्र झाला असून, नागरिक हैराण झाले आहेत. आज (२२ एप्रिल) विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये दमट हवामानामुळे अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता असून, यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे नोंदवले गेले असून, ते तब्बल ४४.६ अंश सेल्सिअस इतके होते. अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा येथेही तापमान ४४ अंशांवर, तर यवतमाळ आणि सोलापूरमध्ये ४३ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
गडचिरोली, शिर्डी, परभणी, गोंदिया आणि जळगाव येथेही तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचले. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांमध्ये दमट हवामानामुळे नागरिकांना अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो. या जिल्ह्यांमध्ये उष्णता अधिक वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये हिटवेवचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने नागरिकांना शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि अंग झाकणारे हलके कपडे वापरावेत, असा सल्ला दिला आहे.