यवतमाळ दि. १९ ऑगस्ट - यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांचे कुटुंबिय धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी यवतमाळमध्ये आले होते. धनंजय मुंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडत असताना 'त्या' महिलांना अश्रू अनावर झाले. शेतकरी नवरा तर गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, असा प्रश्न विचारत त्या भगिनीने हंबरडा फोडला.
कृषी मंत्री धनंजय मुंडे यवतमाळ दौऱ्यावर आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाने आज मुंडे यांची भेट घेतली. कृषी मंत्र्यासमोर कुटुंबाने हंबरडा फोडला. शासनाची मिळणारी मदतही अद्याप मिळाली नसल्याचे तिने धनंजय मुंडे यांना सांगितले. त्यानंतर मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना फोन लावून या दोन्ही कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्याची मदत देण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री मुंडे यांनी घेतली आहे.
आत्महत्येने प्रश्न सुटणार नाही... धनंजय मुंडेंचे
आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर कुटुंबापुढील प्रश्न आणखी वाढतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून कुठल्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत, असे भावनिक आवाहनही धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.