मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत (टोल माफी ) देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी १६ सप्टेंबरपासून ते १ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत देण्यात आली आहे.
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आल्याने कोकणात जाण्याची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी लाखो भाविक गावी जातात. त्यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मागील दोन वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या प्रवाशांना टोलमाफी जाहीर करत पासेसे उपलब्ध करून दिले होते. यंदाच्या वर्षीही मुख्यमंत्री टोल माफी कधी जाहीर करतात याकडे गणेशभक्तांचे लक्ष वेधले होते. अखेर मुख्यमंत्रयांच्या सुचनेनुसार यंदाच्या वर्षीही टोलमाफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
पथकर सवलतीसाठी गणेशभक्तांच्या वाहनांना स्टीकर्स तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच हे पासेस परतीच्या प्रवासाकरीता ग्राहय धरण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची वाहने राज्यातील ज्या जिल्हयातून येणार आहेत तेथील पोलीस ठाणे किंवा प्रादेशिक परिवहन खात्याकडे पोसे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खड्डेमय रस्त्याची धास्ती घेतलेल्या भक्तांना टोलमाफीचा तरी किमान दिलासा मिळाला आहे.